श्री प्रेमानंद महाराज यांच्याविषयी थोडक्यात माहिती
सध्यस्थितीत वृंदावन येथील श्री प्रेमानंद महाराज हे आधुनिक भारतातील एक तेजस्वी आणि भावनिक संत आहेत. वृंदावनधामच्या पावन भूमीत श्री राधा-कृष्णाच्या अखंड प्रेमात तल्लीन असलेले हे संत त्यांच्या निर्मळ वाणीने, प्रेममय प्रवचनांनी आणि समाज प्रबोधनाच्या अनोख्या पद्धतीने लाखो भाविकांच्या हृदयात स्थान निर्माण करत आहेत.
श्री महाराजांच्या वाणीतुन अतिशय प्रेमळ आणि भावनिकच शब्द निघतात. त्यांच्या शब्दांमध्ये “राधे-राधे“, “श्री हरिवंश“, आणि “प्रेम म्हणजेच भगवान” असे भावनिक आणि प्रेमळ विचार असतात. ते प्रवचन करताना कोणत्याही प्रकारचा अहंकार, राग किंवा कोणावरही टीका करत नाहीत. त्यांची बोलण्याची शैली एकाकी किंवा ज्ञानकठोर न राहता अत्यंत सुलभ, प्रासादिक आणि हृदयस्पर्शी असते. प्रवचनांमध्ये ते श्लोक, गीत, भजन, आणि वृंदावनातील लीलांचा संदर्भ देऊन भक्तीमय वातावरण निर्माण करतात.
श्री प्रेमानंद महाराज नेहमी ‘प्रेम हीच ईश्वर प्राप्तीची खरी वाट आहे’ असा संदेश नेहमी त्यांच्या प्रवचनातून देतात. त्यांच्या मते, ईश्वर केवळ बुद्धीने किंवा चालाकीने नव्हे तर अंतःकरणातील प्रेमाने व भावनांनी मिळतो. ते आपल्या प्रवचनात श्री राधा-कृष्णांच्या लीलेचे वर्णन इतक्या सोप्या आणि प्रेमळ भाषेत करतात की, ऐकणारे क्षणातच वृंदावनात असल्याचा अनुभव घेतात. ते कोणत्याची प्रकारचा आड-पडदा न ठेवता सर्व सामान्यांना योग्यतेने आणि प्रेमाने मार्गदर्शन करतात. त्यांच्या वाणीतील विनय, साधेपणा आणि प्रेम हीच त्यांची खरी ओळख आहे. त्यांच्या प्रवचनातून मुल्यशिक्षण, भारताच्या संस्कृतीचा गौरव, आणि नैतिकतेचे मूल्य हे प्रभावीपणे प्रकट होते.
श्री प्रेमानंद महाराज हे कधीही कोणत्याही राजकीय पक्ष्याबाबत किंवा जाती-धर्मांबाबत विचित्र किंवा कोणच्याही भावना दुखावतील अश्या प्रकारचे भाष्य करत नाहीत. त्यांचा एकमेव उद्देश म्हणजे प्रेमाचा प्रसार. त्यांच्या विचारांमधून मानवतेचे महत्त्व, आत्मशुद्धी, कुटुंबातील प्रेम, वृद्धांची सेवा, आणि स्त्री सन्मान यासारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचे भान राहते. कोणताही धर्म द्वेष शिकवत नाही, सर्व धर्म प्रेम शिकवतात” ही त्यांची भूमिका त्यांना समाजप्रबोधन करणारा संत बनवते.
श्री प्रेमानंद महाराज यांच्या नावाचा होत आहे गैरवापर
सध्यस्थितीत प्रेमानंद महाराज यांच्या नावाचा गैरवापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आश्रमाने जनतेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. आश्रमाने स्पष्ट केले आहे की, त्यांच्या नावाने कोणतेही हॉटेल, दुकान किंवा जाहिरात चालविली जात नाही. तसेच, त्यांच्या नावाचा वापर करून कोणत्याही व्यावसायिक उपक्रमांची जाहिरात केली जात असल्यास, ती अधिकृत नाही.
हे सुद्धा वाचा :- रंगजेबाची कबर असलेली जागा कोणाच्या मालकीची? नाव ऐकून बसेल धक्का!
आश्रमाने नोटीसद्वारे सांगितले की,

आपण सर्वांना सूचित व सावध करण्यात येत आहे की, सध्या काही लोक पूज्य गुरुदेव श्री हित प्रेमानंद गोविंद शरण जी महाराज यांचे शब्द व उपदेश Artificial Intelligence (AI) च्या माध्यमातून बदलून किंवा त्यामध्ये काही बदल करून, आपल्या मनाप्रमाणे Social Media Platforms वर विडीओ टाकत आहेत, जे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे.
म्हणून आपण सर्वांनी विनंती आहे की, पूज्य महाराज जी यांची वाणी फक्त त्यांच्या अधिकृत माध्यमातूनच ऐकावी आणि पाहावी. कृपया कोणीही AI चा वापर करून अशा प्रकारचे Videos बनवू नये.
श्री हित राधा केली कुंज ट्रस्ट परिवार, वृंदावन
दिनांक – ०६/०४/२०२५
संत प्रेमानंद महाराज यांच्या नावाचा गैरवापर टाळण्यासाठी, त्यांच्या अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया खात्यांद्वारेच माहिती मिळवावी. त्यांच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही अनधिकृत उपक्रमांची माहिती मिळाल्यास, संबंधित अधिकाऱ्यांना कळवावे असे आवाहन केले आहे.
तसेच त्यांच्या आश्रमाने दुसऱ्या नोटीसमध्ये सागितले की,

- श्री हित राधा केली कुंज ट्रस्ट, वृंदावन (उत्तर प्रदेश) यांची देशातील कोणत्याही भागात कोणतीही शाखा (Branch) नाही.
- श्री राधा केली कुंज ट्रस्ट, वृंदावन कपडे / वस्त्र / प्लॉट / जमिन / घर / अभिषेक सामान / देव्हारे / विक्री (Sale) या कोणत्याही प्रकारची सेवा देत नाही.
- आश्रमाकडून हॉटेल, लॉज, धर्मशाळा, रेस्टॉरंट, वाहन, रूम / फ्लॅट बुकिंग, मेडिकल स्टोअर, हॉस्पिटल, विद्यालय इत्यादींचा कोणताही संबंध नाही.
- आश्रम कोणत्याही सरकारी योजना चालवत नाही.
- आश्रम किंवा पूज्य महाराज जी यांच्या नावाने कपडे, पूजा-सामग्री इत्यादींच्या कोणत्याही दुकान (Online/Offline Shop) शी कोणताही संबंध नाही.
- आश्रम कोणत्याही प्रकारची जाहिरात (Advertisement) करत नाही.
- पूज्य महाराज हे वाणी, प्रवचन, सत्संग, कथा यांचे कोणतेही पैसे घेत जात नाहीत. सर्व कार्यक्रम मोफत (Free) रितीने होत आहे. कृपया अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका.
कृपया आपण सर्वांनी सतर्क आणि सावध राहावे!
पूज्य गुरुदेव श्री हित प्रेमानंद गोविंद शरण जी महाराज व श्री हित राधा केली कुंज ट्रस्ट परिवार यांनी कोणतीही व्यावसायिक सेवा, जाहिरात, दुकान, अथवा संस्था सुरू केलेली नाही.
आपल्याला अधिकृत माहिती हवी असल्यास, कृपया फक्त आश्रमातील कार्यालय (Office) किंवा चौकशी काऊंटर (Enquiry Counter) शी संपर्क साधावा.
निवेदक:
श्री हित राधा केली कुंज ट्रस्ट
श्रीधाम वृंदावन
श्री प्रेमानंद महाराज यांच्या प्रवासा बाबत थोडक्यात माहिती
संत प्रेमानंद गोविंद शरण जी महाराज यांचा जन्म ३० मार्च १९६९ रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर जवळील सरसौल येथील अखरी गावात झाला. १३ व्या वर्षी त्यांनी संन्यास स्वीकारला आणि वाराणसीतील गंगेच्या तीरावर आध्यात्मिक साधना केली. नंतर वृंदावन येथे त्यांनी राधावल्लभ संप्रदायात प्रवेश केला आणि पूज्य श्री हित गौरांगी शरणजी महाराज यांच्याकडून ‘निज मंत्र’ दीक्षा घेतली.
२०१६ साली स्थापन झालेल्या श्री हित राधा केली कुंज ट्रस्टच्या माध्यमातून ते समाजाच्या उन्नतीसाठी कार्यरत आहेत. या ट्रस्टद्वारे वृंदावन धामातील यात्रेकरूंना निवास, अन्न, वस्त्र, वैद्यकीय सेवा आणि इतर आवश्यक सुविधा पुरविल्या जातात. श्री प्रेमानंद महाराज हे केवळ एक संत नाहीत तर प्रेम, शांती आणि आध्यात्मिकतेचा जगता संदेश आहेत. त्यांच्या वाणीतील माधुर्य, शब्दांतील प्रेम, आणि वृंदावनमधील लीलांशी नातं सांगणारी प्रवचनशैली हीच त्यांच्या यशामागची खरी गुरुकिल्ली आहे.