मुंबई : राज्यात यंदा झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी व ग्रामीण जनजीवन मोठ्या संकटात सापडले आहे. शेतजमिनी वाहून गेल्या, पिकांचे प्रचंड नुकसान झाले आणि अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर टाईम्स मराठीतर्फे राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना एक विशेष आवाहन करण्यात येत आहे.
पूरग्रस्त शेतकरी आणि घरकुल धारकांची अडचण लक्षात घेऊन ग्रामपंचायतींनी त्यांच्या कडून आकारण्यात आलेली घरपट्टी आणि स्थानिक कर माफ करण्याचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी आमची ठाम भूमिका आहे. अशा काळात शासन व ग्रामपंचायती यांची सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे जनतेला आधार देणे आणि त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी मदत करणे.
ग्रामपंचायतीकडून मिळणारा महसूल महत्त्वाचा असला, तरी सध्या तो जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न नाही. शेतकऱ्यांचे आयुष्य पुन्हा उभे करणे, त्यांच्या मुलांचे शिक्षण अबाधित ठेवणे आणि घरगुती खर्च भागवण्यासाठी थोडासा आर्थिक दिलासा देणे हा अधिक महत्त्वाचा मुद्दा आहे.
म्हणूनच, महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींनी एकत्र येऊन शेतकऱ्यांची घरपट्टी माफ करावी, स्थानिक करात सूट द्यावी आणि शासनाकडून मदतीची मागणी करावी, असे टाईम्स मराठीतर्फे स्पष्ट करण्यात येते.
पूरग्रस्त शेतकऱ्यांना आधार मिळाल्यास त्यांचे संकट काही अंशी कमी होईल आणि शेतीसह ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळेल.
महापूर विशेष: पूरस्थितीचा विचार करून सर्व ग्रामपंचायतींना ‘टाईम्स मराठी’ ची Special Request
by Anant Wagh
Published On: सप्टेंबर 27, 2025 9:47 pm
